रावसाहेब दानवे, मंत्री बापट, जानकर, खोतांची माझ्यावर टीका करण्याची औकात आहे का, अजित पवारांचा सवाल

Foto

बारामती – भाजप सरकारच्या नाकर्तेपणावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी सरकारमधील टीकोजीराव माझ्यावर उलट-सुलट आरोप करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मोदी लाटेत निवडून आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश बापट, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांची माझ्यावर टीका करण्याची औकात तरी आहे का, असा सवाल अजित पवार यांनी केला.  

बारामतीमधील मोरगाव येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा खरपूस समाचार घेतला. या नेत्यांनी माळेगाव येथील सभेत अजित पवारांवर टीका केली होती. पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवरुन रावसाहेब दानवे म्हणाले होते, की अजित पवारांच्या घराबाहेर पोलिस आहेत, त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यांच्या या टीकेचा पवारांनी बारामतीत समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले, माझ्यावरील प्रकरण अजून न्याय प्रविष्ट आहे. त्यावरुन उलटसूलट आरोप करुन भाजपचे नेते त्यांच्या सरकारचे नाकर्तेपण झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पेट्रोल-डिझेलची दररोज होणारी दरवाढ, राफेलचा घोटाळा यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपचे टिकोजीरावर विरोधकांवर आरोप करत असल्याचा टोला पवारांनी हाणला.

तर मोदी बारामतीत आले नसते...

अजित पवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात उजनी, कोयना धरणाची उंची माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात वाढली होती. पाणी आणि शेतीमध्ये मी आणि पवार साहेबांनी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत आले होते. त्यांनी येथील कामे पाहून आमचे कौतूक केले. मात्र सरकारमधील टीकोजीराव बारामतीत येऊन गरळ ओकू लागले, त्याचे कारण यांनी काहीच केलेले नाही असे पवार म्हणाले.